५ नोव्हेंबर - सोळावा दिवस


वास्तवाची चपराक.

दोन वाजत आले होते. म्हणजे पुढचा दिवस सुरू झाला होता. पण ते शरीराला कळणार कसं झोप काढल्याशिवाय !!

हवाई सुंदरीची प्रात्यक्षिकं वगैरे सुरू झाली. चेहेऱ्यावर तेच ते मुद्दामून आणलेले स्वागतोत्सुक भाव; कसलं ते काळ, वेळ, झोप, जागरण सगळ्याच्या पलिकडे गेलेलं त्यांचं आयुष्य!! ... माझं डोकं आता अजिबात चालत नव्हतं. एकीकडे लंच किंवा डिनर यापैकी काहीही नसणाऱ्या अश्या खाण्याच्या तिसऱ्या प्रकाराचं वाटप सुरू झालेलं होतं. काट्या-चमच्यांचे, पाण्याच्या ग्लासेसचे आवाज कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत काहीही पोचत नव्हतं. मी सीटवर ठेवलेलं पांघरूण पूर्ण डोक्यावरून ओढून घेतलं आणि झोपायचा माझा मनसुबा जाहीर केला. बघता बघता माझा डोळा लागला सुध्दा ...
जराशी डुलकी लागणार इतक्यात एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का?' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली! आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा जरा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील!! पण तिचीही चूक नव्हती. ती यांत्रिकपणे, इमाने-इतबारे तिचं काम करत होती. शक्य तेवढा सौम्य चेहेरा ठेवून मी तिला नकार दिला. आदित्यकडे एक नजर टाकली तर तो केव्हाच गाढ झोपी गेलेला होता. म्हणजे त्यादिवशी त्यालाही ऍपल ज्यूस प्यावसं वाटलं नव्हतं ...

... अर्धवट झोपेत अर्धा-एक तास गेला असेल. सगळे दिवे पुन्हा सुरू झाले, वैमानिकाच्या सूचनेनं जाग आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी!! दहा-पंधरा मिनिटांत विमानानं भारतभूमीवर टायर्स टेकवले होते.
पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा 'आयुबोवान' कानी पडलं, आम्ही एकएक करून बाहेर पडायला लागलो. विमानातून बाहेर पाऊल ठेवल्याक्षणी एक अत्यंत कुबट वास नाकात शिरला. तो खास आपल्या देशाचा वास होता - मुंबईचा म्हणता ये‍ईल फारफार तर! त्या 'खास' वासाबद्दल पूर्वी अजयकडून ऐकलं होतं. तेव्हा मनातल्या मनात त्याला 'अतिशयोक्ती' म्हणून नावं देखील ठेवली होती. पण ते खरं होतं. तो वास आल्याआल्या त्याचे ते उद्गार मला आठवले. 'जावे त्याच्या वंशा...' दुसरं काय!!

सामान घेऊन थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो होतो. सामानाची तपासणी वगैरे काहीच झालं नाही. चार वेगवेगळ्या विमानतळांवरच्या अनुभवानंतर ही गोष्ट चांगलीच खटकली! अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या! जाताना जे-जे भव्य-दिव्य, जगावेगळं वाटलं होतं ते-ते सगळं आता दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं!
बाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या!!! हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची? या घाणीत?? पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले होते, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टींत आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचाय या जाणीवेची जोरदार चपराक पुन्हा एकदा बसली होती! त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मारत 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना!! पण हेच वास्तव होतं, ते स्वप्न होतं ज्यानं आम्हाला गेल्या पंधरा दिवसांत अनोख्या जगाची सफर घडवून आणली होती. चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं!!
पुण्याला जाणाऱ्या मंडळींनी बसची व्यवस्था केली. कल्याण-डोंबिवलीला जायलाही बस होतीच. आम्ही टॅक्सी ठरवली. साडेसहाला जे तिथून सुटलो ते दोन तासांत वापीच्या घरी पोचलो सुध्दा.

दूधवाले, पेपरवाले सकाळच्या लगबगीत होते, ऑफ़िसला जाणारे आपापल्या घाईत होते, दिवाळीची सुट्टी संपायला एक दिवस अवकाश होता त्यामुळे शाळकरी मुलं साखरझोपेत होती ... इथे काहीही बदललेलं नव्हतं ... बदललं होतं ते आमचं अनुभवविश्व!

दुपारी मस्त गरमागरम वरण भात खाल्ला आणि आडवी झाले. संध्याकाळी सहा वाजता झोप पूर्ण झाली. डोळे उघडल्यावर थोडा वेळ काही कळेचना - आपण कुठे आहोत, ही खोली कुठली - काही उलगडेना ........


(समाप्त)

2 comments:

ॐकार केळकर said...

आज हापिसात काम जवळ-जवळ नव्हतंच. वाचायला काहीतरी पाहिजे म्हणून Blogs शोधत होतो.
blog च्या नावात "पूर्वरंग" नांव वाचून लगेच वाचायला शिरलो आणि लेखाचं नांव होतं "सोळावा दिवस".
म्हणजे १६ लेखांची निश्चिती झाली बगूनानाsssss....
पहिला लेख शोधला आणि सलग १६ वाचून काढले.
तसा मी आत्ता Australiaत आहे. परदेश आणि पहिला अनुभव एकदम माझ्याच डोक्यातला तुमच्या blogवर उतरलाय.
पूर्ण लेख-मालिकेबद्दल सांगायचे तर उत्तम लेखन शैली, ओघवती.
वास्तविक कोण दुसऱ्या देशात कधी आणि कसं फिरलं ह्यात वाचण्यासारखं काय? पण लिखाणाची शैलीच अशी आहे कि १६ च्या १६ भाग कथेसारखे वाचून काढले गेले. तुम्हाला शेवटी भटकंती संपली म्हणून वाईट वाटले असेल, पण मलाही वाईट वाटले कारण अजून फिरला या असतात तर मला अजून वाचायला मिळाले असते.
सगळेच उत्तम आहे, पण त्यातूनही २-३ वाक्य मी मुद्दाम निवडल्येत कि त्यावर खास प्रतिक्रिया द्यावी.


घाबरायचं केव्हा, जेव्हा ताबा ठेवण्याचं काम आपल्या हातात असेल.
-- अगदी मनातलं. मी इथे Skydive केलं. अजिबात भीती वाटली नाही. हेच कारण! आपण काहीच करायचं नसतं. ना काही करू शकत. तोच आपल्याला घेऊन उडी मारतो, तोच Parashute उघडणार...

कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच. त्यांची कुठली ना कुठली तरी शाब्दिक कोटी, कुठला ना कुठला तरी विनोद त्या प्रसंगात चपखल बसतोच.
-- या बाबतीतही काहीही फरक नाही. पुलंकित झालेला माणूस दिवसातून ४ वेळा एकटाच हसणार. त्याच्या नजरेला काही गोष्टी नुसत्या दिसतंच नाहीत.
साधं डुक्कर दिसलं तरी "बाबा तुम्ही मला जे डुक्कर म्हणता ते हेsssच? असा निरागसपणे शेंबूड पुसत प्रश्न विचारणारा शंकऱ्याच येणार!
बरं कोणाला काही समजावून सांगायची सोय नाही, त्याच्या डोक्यात त्यातला विनोद जाऊच शकत नाही.

वर डोकं-खाली पाय अश्याच वर्षानुवर्षांच्या अवस्थेत जमिनीवरच चालावं लागणार होतं.
-- हे वाक्य नुसतं वाचलं तर कदाचित फार काही वाटणार नाही. पण एखादी गोष्ट लिहिताना लिखाणा-लिखाणात जो फरक दिसतो तो हाच.

एकदा त्या चॉकोलेट्सची खरेदी झाल्यावर आदित्यच्या दृष्टीनं सहल 'सुफळ संपूर्ण' झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस तो 'आता उरलो उपकारापुरता' अश्या अविर्भावातच वावरत होता.
-- चक्क डोळ्यासमोर तो येऊन गेला वाचताना. लिहिणाऱ्याच्या शब्दामागचा जो भाव असेल लिहिताना तोच अगदी तस्सा वाचताना जाणवला कि लिखाणाच्या शैलीने आपलं काम चोख केलेलं असतं.

एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का?' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली! आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे
--प्रचंड बेकार हसलो होतो एकटाच ऑफिसात. कोणाला काही सांगायची सोय नव्हती इथे, काय दगड कळणार होतं?
माझाही असाच अनुभव आहे. फक्त मी स्वतःच उठत होतो झोपेतून, भूक लागल्ये. उगाचच घड्याळात बघून "हि काय वेळ आहे का" हा प्रश्न मनात येऊन हसून सोडूनही दिलेला आहे. अनुभव खूप लोकांनी घेतलेला असेल, पण भाषेची मजा भारीच. साधासा अनुभव खास होतो.


चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं
-- अत्यंत कमी शब्दात माझ्यासारख्या भारतीयाची मानसिकता. कदाचित जास्त शब्द वापरून हे मंदाताही येणार नाही, पण एका लहान वाक्यात सगळं सामावलंय तुम्ही!

-- ॐ रत्नांग्रीकर (http://omkarkelkar.blogspot.com)

प्रीति छत्रे said...

ओंकार केळकर,
भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. आपण लिहिलेलं कुणीतरी रस घेऊन आणि बारकाईने वाचतंय ही जाणीव नेहमीच सुखावणारी असते.
गेले काही दिवस प्रवासात होते. त्यामुळे तुमचा प्रतिसाद आज पाहिला. इतका जुना ब्लॉग अजून वाचला जात असेल हे मला जरासं अनपेक्षितच होतं.

माझ्या इतर दोन ब्लॉग्जची लिंकही देते आहे.

http://maaza-indradhanushya.blogspot.in

https://war-stories-collection.blogspot.in/

इथलं लेखनही तुम्हाला आवडेल अशी आशा.