३ नोव्हेंबर - चौदावा दिवस



तीन दिवसांत तिसरं हॉटेल ...


मलेशियातला तो आमचा तिसरा दिवस होता. आधीच्या दोन दिवसांत मलाय शब्दसंग्रहात थोडी भर पडली होती. Pintu म्हणजे 'दरवाजा', Masuk म्हणजे 'प्रवेश', Keluar म्हणजे 'बाहेर जायचा रस्ता', Dilarang Masuk म्हणजे 'प्रवेश निषिध्द' वगैरे, वगैरे. अर्थात हे ज्ञान हॉटेलमधल्या निरनिराळ्या पाट्या वाचून आलेलं होतं. कानावर पडणाऱ्या शब्दांतून मात्र कुठलाही बोध होणं कठीणंच होतं.

परतायला दोनच दिवस अवकाश होता आणि एक अप्रिय गोष्ट घडली. आमच्या गृपमधल्या एक आजी हॉटेलच्या लॉबीत पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या कंबरेला जबर दुखापत झाली. त्यांना ताबडतोब तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एक रात्र तिथेच रहावं लागलं. त्यांच्या कंबरेचं हाड एका ठिकाणी मोडलं होतं असं कळलं. पुढचे दोन दिवस त्यांना हॉटेलच्या खोलीतच पडून रहावं लागलं. चौदाव्या दिवसाची सुरूवात या गालबोटानंच झाली होती....

जसं गेंटींग हायलंडला एक दिवस थीम-पार्क मध्ये घालवला, तसंच त्या दिवशी 'सन-वे लगून' रिसॉर्टच्या 'वॉटर पार्क' मध्ये दिवसभर धम्माल करायची होती. पण त्यापूर्वी ते आवडलेलं हॉटेल आणि ती सतराव्या मजल्यावरची आवडलेली खोली सोडायची होती. दर एक-दोन दिवसांनी सामान उचकायचं, पुन्हा भरायचं हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं. सामानसकट तिथून बसनं निघालो आणि थोड्याच वेळात त्या रिसॉर्टला पोचलो.
त्या परिसरात वेगवेगळ्या दर्जांची ४-५ हॉटेल्स होती. आमचा मुक्काम 'सन-वे पिरॅमिड' नामक हॉटेलमध्ये होता - तो ही फक्त २४ तासांसाठी.... मलेशियात आल्यापासून तीन दिवसांत आम्ही तीन हॉटेल्सचं मीठ खाल्लं होतं!!

'सन-वे लगून' हा परिसर म्हणजे दक्षिण आफ़्रिकेतल्या 'सन सिटी'ची हुबेहूब प्रतिकृति आहे असं समजलं ... तेच सन सिटी जिथे काही वर्षांपूर्वी 'मिस वर्ल्ड' स्पर्धा झाली होती, ज्याच्या विरोधात खूप निदर्शनं झाली होती आणि ज्या स्पर्धेत आपली ऐश्वर्या जिंकली होती ... असं ते शहर फक्त ऐकूनच माहीत होतं. आता मूळ कलाकृतीच पाहिलेली नसल्यामुळे तिची ही प्रतिकृति हुबेहूब आहे की नाही ते कळणार कसं? आणि तसंही, ते न कळल्यानं काही फरकही पडणार नव्हता. किमान प्रत्यक्ष त्या 'सन सिटी'ला भेट दे‍ईपर्यंत तरी!! ही नक्कल सही-सही होती किंवा कसं ते तिथे गेल्यावर ठरवता आलं असतं ... त्या क्षणी तरी 'वॉटर पार्क' वर लक्ष केंद्रित करायचं ठरवून निघालो.
'वॉटर पार्क'ला जायची वाट आमच्या हॉटेलच्या मागच्या बाजूनं, एका ५-६ मजली चकाचक 'शॉपिंग मॉल'च्या तिसऱ्या मजल्यावरून जात होती. पूर्वीचे चौकोनी वाडे असायचे तशी काहीशी त्या मॉलची रचना होती - म्हणजे, मध्ये मोकळी जागा आणि चहूबाजूंनी दुकानं. तळमजल्यावरच्या मोकळ्या जागेत 'फ़िगर स्केटिंग' आणि 'आईस हॉकी' खेळण्याची सोय होती. अगदी लहान-लहान मुलंसुध्दा तिथल्या गुळगुळीत बर्फाच्या पृष्ठभागावरून सहज इकडे-तिकडे करावं तशी फिरत होती, सराव करत होती. तिथला दिव्यांचा लखलखाट, झगमग, ती छानछान दुकानं, ते स्केटिंग - हे सगळं पाहून आम्ही थोडा वेळ 'वॉटर पार्क' वगैरे विसरूनच गेलो. संध्याकाळी त्या दुकानांतून एक-एक चक्कर टाकायचीच असं मनोमन ठरवून टाकलं.
त्या मॉलमधून पुढे गेल्यावर एका लिफ़्टनं सहा-सात मजले वर जाऊन मग वॉटर पार्कच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता यायचं. वाटेत ठिकठिकाणी 'काम चालू, गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत' अश्या पाट्या दिसत होत्या. पण त्या इंग्रजीतच होत्या ... त्यामुळे मलाय भाषेत दिलगिरी कशी व्यक्त करतात ते समजण्याची एक मोलाची संधी हुकली. त्या वॉटर पार्कचं आधुनिकीकरण चालू होतं. म्हणजे, 'इथे अजून काहीतरी नवीन बनतंय जे आपल्याला पहायला मिळणार नाहीये' याचीच रुखरूख तिथे शिरण्यापूर्वी !!! ... 'अजून ४-६ महिन्यांनी आलो असतो तर नव्या स्वरूपातलं वॉटर पार्क बघायला मिळालं असतं' असा विचार हटकून आलाच मनात !! जे मिळतंय त्यात आनंद मानायच्याआधीच जे हुकणार आहे त्याबद्दल हळहळ का वाटते आपल्याला?

गेंटिंग हायलंडच्या थीम-पार्कप्रमाणेच इथेही दिवसभर सगळेजण आपापली वयं विसरून चिक्कार हुंदडले. दुपारच्या जेवणानंतर आम्ही थोडे ढेपाळलो पण आदित्यचा उत्साह कायम होता. त्याला पुन्हा पाण्यात डुंबायचं होतं, उड्या मारायच्या होत्या. त्याच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून त्याला पाण्यात सोडलं आणि आम्ही काठावर बसून राहिलो आरामात. पण अर्ध्या-एक तासात आभाळ भरून आलं आणि गडगडाटासह पाऊस सुरू झाला. सर्वांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायला सांगण्यात आलं.परतताना वाटेत एके ठिकाणी Sandstone Exhibition होतं ते पाहिलं. फ़्लॉवरच्या गड्ड्यांसारखे किंवा मश्रूमसारखे दिसणारे निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे दगड मांडून ठेवले होते आणि जोडीला आकर्षक प्रकाशयोजना केलेली होती. दगडांचे ते नैसर्गिक आकार केवळ अप्रतिम होते!!

संध्याकाळी मॉलमधून फेरफटका मारायचा निश्चय काही मजल्यांपुरता पूर्णत्वाला नेता आला. पाण्यात खेळून पाय खूप दुखायला लागले होते, त्यात तो ५-६ मजल्यांवरचा अगणित दुकानांचा पसारा ... उत्साह खूप होता पण २-३ मजले फिरून होईपर्यंत पायांनी असहकार आंदोलन सुरू केलंच!! मग हॉटेलवर परत येऊन थोडा वेळ निवांत गप्पा-टप्पा केल्या, पत्ते खेळलो. आमच्या खोलीच्या खिडकीतून खालच्या कॉफ़ी-शॉपमधला मोठा टी.व्ही.चा पडदा दिसत होता. कुठलातरी फ़ुटबॉलचा सामना चालू होता, तो पाहिला थोडा वेळ.

जेवणं झाल्यावर हॉटेलच्या बाहेर एक फेरी मारून आलो. सगळीकडे दिवाळी-ईद निमित्त अतिशय सुंदर रोषणाई केलेली दिसली. त्या असंख्य नाजूक दिव्यांच्या सोबतीनं निवांत फिरायला फारच छान वाटलं. सण आणि दिव्यांचा झगमगाट यांचं जगभर अतूट नातं आहे. आपल्याकडेही नवरात्रात, गणेशोत्सवात त्याच तोडीची रोषणाई असते, फक्त त्याच्या जोडीनं कर्कश्य आवाजातली गाणीही असतात जी त्यातली मजा पार घालवून टाकतात ...

हॉटेलवर परतल्यावर पुन्हा सामानाची आवराआवर करायची होती ... दुसऱ्या दिवशी परतीचा विमान-प्रवास होता. मलेशिया सोडताना थोडी रुखरुख जाणवली की थीम-पार्क, वॉटर-पार्कच्या नादात तिथल्या साध्या-साध्या गोष्टी निरखायला मिळाल्या नाहीत. पण २-३ दिवसांच्या धावत्या भेटीत दुसरं काय होणार? तसं बघितलं तर फक्त सिंगापूरच का, प्रत्येक देशात, प्रत्येक ठिकाणीच किमान आठवडाभर तरी राहता आलं पाहिजे ... जे कुणालाच शक्य नाही. मग ती दुधाची तहान अशी ताकावर भागवावी लागते ... पण निदान तेवढं तरी करायलाच हवं आणि ते आम्ही केलं होतं....
खरं म्हणजे 'दुधाची तहान ताकावर ...' असं म्हणून पंधरा दिवसांच्या अभूतपूर्व आणि अनेक अर्थांनी आनंददायी घटनांवर बोळा फिरवायची कुणाचीच इच्छा नव्हती ... !!!

२ नोव्हेंबर - तेरावा दिवस


ट्विन टॉवर्सची दिवसभर सोबत ...

दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली की सबंध दिवस छान जातो असं म्हणतात. सलग तेरा दिवस प्रसन्न सुरूवात आणि छान दिवस - ही म्हणजे एक जंगी मेजवानीच होती. बरं, रोज त्या प्रसन्नतेचे वेगवेगळे प्रकार! आता त्यादिवशीचंच बघा ना... आदल्या दिवशी खिडकीतून दिसलेल्या विहंगम दृश्यानं समाधान झालं नव्हतं जणू, म्हणून त्या दिवशी सुध्दा उठल्याउठल्या पुन्हा पडदे सारून बाहेर नजर टाकली. धुकं खूप कमी दिसलं. पण त्यामुळे आधी न दिसलेली एक गोष्ट अचानक समोर आली!! चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि आदल्या दिवशी धुक्यात लपलेलं क्वालालंपूर शहर!! साताऱ्याहून येताना कात्रजचा बोगदा ओलांडला की कसं अचानक पुणे शहर समोर लुकलुकायला लागतं - अगदी तसंच! मग आम्ही निरनिराळ्या खिडक्यांतून डोकावून बघण्याचा सपाटाच लावला. हॉटेल-लॉबीच्या एका खिडकीतून पूर्वानं लांबवर 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' आणि 'के. एल. टॉवर' पण शोधून काढले. पुढचा अर्धा तास मग त्या खिडकीतून फ़ोटो काढण्यासाठी सगळ्यांची रांगच लागली.

त्या दिवशीची पहिली आकर्षणाची गोष्ट होती ती म्हणजे 'दिवसाचा 'केबल कार'चा प्रवास'. आदल्या दिवशी करकरीत तिन्हीसांजेला त्या काळ्याकुट्ट जंगलानं मनावर जे दडपण आणलं होतं ना ते मला झुगारून द्यायचं होतं. त्या जंगलाची ती तशी आठवण मला पुसून टाकायची होती आणि झालंही तसंच.
ते घनदाट पर्जन्यवन आता सकाळच्या कोवळ्या, प्रसन्न उन्हात फारच देखणं वाटत होतं. 'अचानक होणाऱ्या बिघाडा'चा विचारही शिवला नाही मनाला ... कारण कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी वाटेत ठिकठिकाणी अतिशय उत्कृष्ट यंत्रणा उभी केलेली दिसत होती आणि निसर्गदृश्याचं वर्णन काय करावं...!! 'हिरव्या रंगाची मुक्त उधळण' वगैरे शब्द थिटे पडले असते!! जोपर्यंत निसर्गाशी केवळ अश्या रसग्रहणापुरता संबंध ये‍ईल तोपर्यंत असेनात का सगळी माणसं त्याच्यादृष्टीनं किडा-मुंग्यांसारखी!!
.... परतीचा तो प्रवास आदल्या दिवशीपेक्षा फारच पटकन झाल्यासारखा वाटला. आदित्यच्या दृष्टीनं मात्र थीम-पार्क, केबल-कार वगैरे सगळं केव्हाच भूतकाळात जमा झालं होतं कारण आमची बस आता 'चॉकोलेट फ़ॅक्टरी'च्या दिशेनं निघाली होती!

त्या चॉकोलेट फ़ॅक्टरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे केवळ शाकाहारी चॉकोलेट्स बनवली आणि विकली जातात. 'चॉकोलेट फ़ॅक्टरी' नावावरून वाटलं होतं की चॉकोलेट्स बनवण्याची प्रक्रिया पहायला मिळेल. पण प्रत्यक्षात आम्ही गेलो ते चॉकोलेट्सच्या दुकानात. सुरूवातीलाच, तिथल्या एका विक्रेत्याने सगळ्यांना खूष करून टाकलं - मलेशियन उच्चारांच्या इंग्रजीत माहिती देताना आम्हाला चक्क २-३ हिंदी वाक्यं ऐकवली. ती सुध्दा उगीच इकडची तिकडची नाहीत तर कुठली चॉकोलेट्स स्वस्त पडतील ते मुद्दाम हिंदीत सांगितलं. आधीच शाकाहारी चॉकोलेट्स म्हटल्यावर तमाम जोशी, परांजपे, छत्रे मंडळी सरसावली होती; त्यात आता स्वस्त चॉकोलेट्स कुठली ते ही कळलं. मग आदित्यची काय कथा... सगळ्या मोठ्या माणसांनासुध्दा 'हे घेऊ की ते घेऊ' असं झालं होतं. एकदा त्या चॉकोलेट्सची खरेदी झाल्यावर आदित्यच्या दृष्टीनं सहल 'सुफळ संपूर्ण' झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस तो 'आता उरलो उपकारापुरता' अश्या अविर्भावातच वावरत होता.
अर्ध्या-पाऊण तासानं, त्या दुकानाचा भरपूर फायदा करून दिल्यावर तिथून निघालो. गेंटिंग हायलंड परिसराला टा-टा करून आमची बस आता क्वालालंपूरच्या दिशेनं निघाली. उरलेला दिवस 'क्वालालंपूर दर्शना'चा कार्यक्रम होता.

प्रथम घड्याळांच्या एका मोठ्या दुकानात गेलो. Window Shopping आणि खरंखुरं shopping यात तासभर घालवून मग प्रसिध्द Batu Caves पहायला गेलो.
वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत उभ्या असलेल्या डोंगरांत नैसर्गिकरीत्या त्या क्षारांच्या गुहा तयार झालेल्या आहेत. काही-शे वर्षांपूर्वी त्यांचा शोध लागला. मग तिथे कार्तिकस्वामींचं देऊळ बांधण्यात आलं. जगातलं ते एकमेव असं कार्तिकस्वामींचं देऊळ आहे की जिथे स्त्रियांनाही प्रवेश आहे म्हणे. २७० पायऱ्या चढून गेल्यावरच ते दुर्लभ दर्शन होणार होतं. खरंतर असल्या भेदभावांची मला मनस्वी चीड आहे. पण पुन्हा एकदा मी स्वतःलाच समजावलं की 'देऊळ बघायला' म्हणून जायचंच नाही. त्या‍ऐवजी 'निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार' पहायला म्हणूनच जायचं.
ती पायऱ्यांची संख्या ऐकूनच अर्ध्याअधिक आजी-आजोबांनी माघार घेतली. बाकीच्यांनी गिर्यारोहण सुरू केलं. आमच्या सहाजणांपैकीही दोनच गडी होते त्यांत - मी आणि आदित्य. पायथ्यापाशी कार्तिकस्वामीचा अतिभव्य आणि उंचच्या उंच, उन्हात लखलखणारा सोनेरी रंगाचा पुतळा उभा होता. पुतळ्याच्या शेजारूनच पायऱ्या वर जात होत्या. २७० ही संख्या आधीच कळली असल्यामुळे मारे अगदी उत्साहात मी पायऱ्या मोजायला सुरूवात केली होती आणि पाचच मिनिटांनी दमून, घामेघूम हो‍ऊन जेव्हा पाणी पिण्यासाठी थांबले तेव्हा काही मिनिटांपूर्वी आपण कशाचीतरी मोजदाद करत होतो हे विसरूनही गेले होते! पायऱ्या उंच असल्यामुळे खूप दम लागत होता शिवाय ऊनही खूप होतं.
.... पण, १५ मिनिटांनी जेव्हा वर पोचले आणि त्या गुहांचा दर्शनी भाग जेव्हा दृष्टीस पडला तेव्हा इतके कष्ट घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं ... अनंत काळापासून जमत आलेले क्षार आणि त्यांपासून बनलेले तिथले चित्रविचित्र आकार खरंच थक्क करणारे होते. दोन दिवसांत दुसऱ्यांदा निसर्गापुढे नतमस्तक होण्याची वेळ आलेली होती. प्रत्यक्ष देवळापाशी पोचायला पुढे थोडं चालत जायचं होतं. 'गुहा' म्हटल्यावर जे डोळ्यांसमोर ये‍ईल त्यापेक्षा तो अंतर्भाग खूपच मोठा होता - जवळजवळ ३-४ मजली उंचीचा आणि ४०-५० फ़ूट रुंदीचा!! देवळांच्या गाभाऱ्याबाहेर एखादा सभामंडप असतो. तिथे त्याची गरजच नव्हती कारण एवढा प्रचंड नैसर्गिक सभामंडप आपणहूनच तिथे हजर होता. काही ठिकाणी तर डोंगरांना लहानमोठी आरपार भगदाडं पडलेली होती. म्हणजे उजेडाचा प्रश्नही मिटला. कडेकपारींमधून साचलेलं पाणी तिथून खाली सांडत होतं. कडक उन्हाच्या आणि काळ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर ते पाण्याचे थेंब अक्षरशः मोत्यांसारखे भासत होते. इतरांना देवदर्शनानं जेवढं समाधान मिळालं त्याहूनही कणभर अधिकच मला मिळालं तिथले हे असे निसर्गाचे सगळे चमत्कार बघून!!! नाईलाजास्तव खालीच थांबलेल्या आमच्या म्हाताऱ्या मंडळींसाठी म्हणून मी भरपूर फ़ोटो काढले की दुधाची तहान निदान त्यांना ताकावर तरी भागवता यावी ...

अर्ध्या तासानं उन्हातून थकून-भागून खाली उतरलेल्या मंडळींची क्षुधाशांती करायला एक शहाळंवाला हजर होताच आणि तो ही आदित्यनंच शोधून काढलेला ... त्याच्याकडचे नारळही बॅंकॉकसारखेच - मोठे, जड, पसरट आणि बाहेरून पांढऱ्या रंगाचे.

तिथून जायचं होतं के. एल. टॉवर पहायला ... किंबहुना के. एल. टॉवरवरून संपूर्ण क्वालालंपूर शहर पहायला. निसर्गनिर्मित चमत्कार पहायला २७० मानवनिर्मित पायऱ्या चढून झाल्या, आता मानवनिर्मित चमत्कार पहायला 'लिफ़्ट' सारख्या अजून एका मानवनिर्मित चमत्काराच्याच मदतीने हजार-बाराशे फ़ूट उंची गाठायची होती. के. एल. टॉवरच्या Observation Deck वर आम्ही जाणार होतो. दूरसंचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जगातल्या पाच सर्वात उंच टॉवर्समध्ये तो गणला जातो. हजार फ़ूट उंचीवरच्या Observation Deck वर नेण्यासाठी चार मोठ्या लिफ़्ट्स होत्या. आम्ही घड्याळ लावून पाहिलं - अक्षरशः एका मिनिटाच्या अवधीत आम्ही ती उंची गाठली होती!!
नावाप्रमाणेच आसपासचा परिसर न्याहाळण्याची ती जागा होती. चहूबाजूंना काचेच्याच भिंती होत्या. खाली विस्तीर्ण पसरलेलं शहर दिसत होतं.... आणि समोरच जणू एखादी शेजारची इमारत दिसावी तसे 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' दिसत होते. अगदी जवळ - शंभर पट Zoom-in केल्यासारखे!!! त्यांचं धातूचं बाह्य चंदेरी आवरण उन्हात चमचम करत होतं. त्यांच्यासमोर इतर उत्तुंग इमारती खुज्या वाटत होत्या.
अर्धा तास तिथे होतो, बरंच काही डोळ्यांत साठवायचा प्रयत्न केला. पण हळुहळू, त्या हजार फ़ूट उंचीवरसुध्दा पोटात भुकेमुळे तेवढाच खोल खड्डा पडायला सुरूवात झाली होती. तुम्ही हजार फ़ूट उंचीवर असा किंवा जमिनीखालच्या एखाद्या खोल खाणीत असा ... शरीराचं घड्याळ टिकटिक करत भुकेच्या, झोपेच्या वेळांची जाणीव करून देण्याचं थांबवत नाही!

त्या टॉवरच्या तळमजल्यावरच्या रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. मिनिटभराच्या आत लिफ़्टनं पुन्हा 'जमिनीवर' आलो. रेस्तरॉ रिकामं होतं आणि गरमागरम जेवण आमची वाट बघत होतं. जोडीला कांदा-भजी, गोडाचा शिरा आणि मुख्य म्हणजे दही होतं मस्तपैकी!! सगळ्यांनी आडवा हात मारला ते सांगायला नकोच - विशेषतः शिऱ्याचं भांडं तर पटापट रिकामं होत होतं.

जेवणानंतर निघालो. पेट्रोनास टॉवर्सपाशी फक्त फ़ोटो काढायला थांबायचं होतं. दरम्यान ढग भरून आले होते आणि भुरभूर पाऊस पडायला सुरूवात झाली होती ..... चुटपुट क्र. तीन!! पावसात फ़ोटो काढायला बसमधून उतरावं की नाही ते ठरेना थोडा वेळ. मी आणि अजय उतरलोच शेवटी आणि तेच बरं झालं, नाहीतर इतर उतरलेल्या लोकांनी काढलेले फ़ोटो नंतर पाहून 'चुटपुट क्र. चार' व्हायला वेळ लागला नसता.... कसेबसे १-२ फ़ोटो काढले घाईघाईत आणि फार भिजायच्या आत पळत पुन्हा बसमध्ये चढलो. निरनिराळ्या कोनांतून त्या टॉवर्सची उंची टिपायची इच्छा मात्र अपूर्णच राहिली....
त्या दोन्ही टॉवर्सच्या ४१व्या आणि ४२व्या मजल्यांना जोडणारा एक पूल आहे. पर्यटकांना तिकीट काढून त्या पुलापर्यंत जाता येतं आणि त्यासाठी पहाटेपासून लोकांच्या रांगा लागतात असं कळलं. सांगायचा मुद्दा म्हणजे काही मिनिटांपूर्वी 'चुटपुट क्र. चार' टाळल्याच्या माझ्या आनंदावर ताबडतोब विरजण पडलं होतं....

भुरभुरणाऱ्या पावसातून बसमधूनच गाईडनं 'हायकोर्ट, ब्रिटीशकालीन फ़ुटबॉल मैदान' इ. २-३ ठिकाणं दाखवली. बस जसजशी वळणं घेत होती तसतसे ते ट्विन टॉवर्स कधी उजवीकडे, कधी डावीकडे, कधी मागे, कधी समोर असे दिसतच राहिले.

आता पाऊस थांबला होता. आम्हाला उतरायचं होतं एक चिनी देऊळ पहायला. पुन्हा एकदा, त्या देवळाची रंगसंगती, वास्तुरचना सगळंच वेगळं आणि बघण्यासारखं होतं. चिनी-जपानी घरांची छपरं, देवळांचे कळस दोन्ही टोकांना कुत्र्याच्या शेपटीसारखे गुंडाळलेले दिसतात. ते आकार मला फार आवडतात.... आणि त्यात वापरलेला भगवा आणि हिरवा रंग सुध्दा. आपल्या देवळांत देवाच्या पायाशी तुळशीपत्रं, बिल्वपत्रांच्या रुपात हिरवा रंग असतो, डोक्यावर शेंदराचा भगवा रंग असतो - तिथे देवळाच्या कळसावरच हे दोन्ही रंग विराजमान झालेले होते.
लांबवर पुन्हा ट्विन टॉवर्स नजरेस पडले. आयफ़ेल टॉवरचं वर्णन करताना पु. लं. नी 'अपूर्वाई'त लिहिलंय की पुण्यात जशी पर्वती कुठूनही दिसते तसाच आयफ़ेल टॉवर पॅरिसमध्ये कुठूनही दिसतो. त्याप्रमाणेच पेट्रोनास ट्विन टॉवर्स क्वालालंपूरमध्ये कुठूनही दिसतात!
चिनी देवदर्शनानंतर मलाय राजप्रासाददर्शन होतं... पण फक्त बाहेरूनच. राजवाडा म्हटला की तो भव्य, सुंदर, स्वच्छ असायचाच - तसाच तो ही होता. आत प्रवेश नसल्यामुळे यापलिकडे त्याबद्दल काही कळू शकलं नाही.

.... 'क्वालालंपूर दर्शन' संपलेलं होतं. आता हॉटेलवर परतायची वेळ झालेली होती. पण 'हॉटेलवर परतायचं' म्हणायला आम्ही अजून आमचं तिथलं हॉटेल कुठे पाहिलं होतं. लगेच उत्सुकता जागी झाली - इथलं हॉटेल कसं असेल, आधीच्या सगळ्या हॉटेल्ससारखंच की त्यांपेक्षा जास्त चांगलं असेल वगैरे, वगैरे. जास्त विचार करावा लागला नाही, ५-१० मिनिटांत बस Hotel Pearl International च्या आवारात शिरलीच.

प्रथमदर्शनी हॉटेल एकदम झकास वाटलं. खोल्या ताब्यात मिळायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागला. दिवसभराच्या दगदगीपायी तो वेळ थोडा कंटाळवाणा गेला, शिवाय 'अजून फक्त २ दिवस, मग परतायचंय' याचीही प्रथमच जाणीव झाली पण 'खोल्या १७ व्या मजल्यावर आहेत' हे कळल्यावर पुन्हा एकदा अंगात उत्साह संचारला. लिफ़्टनं वर जाताना कळलं की पाचव्या मजल्यावर पोहण्याचा तलाव होता. आदित्यला एकदम आठवलं की गेल्या ४-५ दिवसांत त्यानं पाण्यात डुबक्या मारल्याच नव्हत्या. लगेच त्याची भुणभुण सुरू झाली. वर जाऊन सामान ठेवलं आणि आधी साहजिकच खिडक्यांचे पडदे सारले. हिरवे डोंगर, उत्तुंग इमारती, वाहनांनी भरून वाहणारे रस्ते, मावळतीला आलेला सूर्य अशी सगळी सरमिसळ दिसली. त्यात वेगळं काही नव्हतं, फक्त Bird's Eye View मिळाला सगळ्याचा आणि खरं नाविन्य त्यातच होतं. शिवाय उजवीकडे लांबवर दोन बारीक रेषांप्रमाणे भासणारे ट्विन टॉवर्स होतेच सोबतीला!! मी त्या खिडकीत बसून माझी आवडती वाफाळती कॉफ़ी प्यायले. सतराव्या मजल्यावरची खिडकी आणि हातात कॉफ़ीचा कप ... त्यादिवशी त्या कॉफ़ीनं काही निराळीच मजा आणली!!
इकडे आदित्यला खाली पाचव्या मजल्यावरचा पोहोण्याचा तलाव खिडकीतून जास्तच खुणावायला लागला होता. आता त्याच्याबरोबर जाणं भाग होतं.
तासभर पाण्यात डुबक्या मारून झाल्यावर त्याला बाहेर काढलं. तसंही संध्याकाळचे सात म्हणजे तलाव बंद होण्याची वेळ झालेलीच होती. रात्रीच्या जेवणाचं ठिकाण हॉटेलपासून थोडं लांब होतं. त्यामुळे आम्ही साडेसातलाच निघालो. त्यादिवशी प्रथमच जेवणाबरोबर ग्लासभर ताक मिळालं. त्यामुळे मजा आली जेवायला. चारही देशांपैकी फक्त मलेशियातच आम्हाला ताकदह्याचं दर्शन घडलं....

साडेदहा वाजून गेले होते. हॉटेलवर परतलो. आता रात्रीच्या अंधारात ट्विन टॉवर्सच्या त्या दोन रेषा पिवळ्या दिव्यांनी झगमगत होत्या. रस्ते अजूनही वाहतच होते. ते वाहणारे रस्ते त्या खिडकीतून बघायला इतके का छान वाटत होते ते तेव्हा माझ्या लक्षात आलं - धावणारी वाहनं दिसत होती, त्यांचे लाल-पिवळे दिवे दिसत होते पण कर्णकर्कश्श हॉर्न्स कानावर आदळत नव्हते की पेट्रोलचा, धुराचा वास नाकात शिरत नव्हता. सतरा मजल्यांच्या उंचीनं ट्रॅफ़िकसारख्या एका डोकं उठवणाऱ्या गोष्टीचं एका मनमोहक दृश्यात रुपांतर केलं होतं. तो तसा मनमोहक(!) ट्रॅफ़िक मी बराच वेळ न्याहाळत बसले होते.

.... पण त्या सगळ्यावर बोळा फिरवणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच ते हॉटेल आम्हाला सोडायचं होतं!!! सर्वात आवडलेल्या हॉटेलमध्ये आमचं सर्वात कमी वास्तव्य होतं. एकाच दिवसात चुटपुटींचा आकडा तीननं वाढला होता ....!!!

१ नोव्हेंबर - बारावा दिवस



थीम-पार्कमध्ये एक दिवस ...


आदल्या दिवशी आम्ही 'गेंटींग हायलंड'ला पोचलो तोवर रात्र झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर आधी खिडकीतून बाहेरचं दृश्य बघितल्याशिवाय मला करमलंच नसतं. सकाळची वेळ, सूर्याची कोवळी किरणं, थंडी, धुकं, हिरव्या डोंगरदऱ्या यांच्या मिश्रणातून जे तयार होतं ना त्याला केवळ 'लाजवाब' हाच एक शब्द योग्य आहे - मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा! त्यावेळची ती गार, ताजी-ताजी हवा नाकात भरून घ्यायला मला फार आवडते.
आमच्या खोलीच्या खिडकीतून हॉटेलचा परिसर दिसत होता. तिथली बाग, रस्ते काही अंतरानंतर धुक्यात हरवून गेलेले होते. लांबवर तर डोंगरसुध्दा धुक्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपल्यासारखे वाटत होते.आमच्यापैकी एक-दोन काका बागेतल्या रस्त्यावरून फिरायला निघालेले दिसले. मला हे कसं सुचलं नाही कोण जाणे. खरंतर मला पहाटे लवकर उठणं अजिबात जमत नाही आणि आवडतही नाही. पण अश्या काही मोजक्या कारणांसाठी मात्र मी पहाटे उठायला सुध्दा एका पायावर तयार असते. सकाळी फिरायला जाण्याचा बेत दुसऱ्या दिवशी अमलात आणायचा ठरवला आणि तो आईला सांगायला घाईघाईने तिच्या खोलीत गेले. ती माझी वाटच पाहत होती कारण तिच्या खोलीच्या खिडकीतून दिसणारं दृश्य तिला मला दाखवायचं होतं. मी सुध्दा अगदी जोरात 'हो, मी पण पाहिलं सकाळी उठल्याउठल्या ...' असा भाव मारत पडदे सारले और मेरी तो बोलती ही बंद हो गयी कारण मी जे आधी पाहिलं होतं ते यापुढे काहीच नव्हतं!! इथे हॉटेलचा परिसर, रस्ते-बिस्ते काही नाही .... नजर जाईल तिकडे पामवृक्षांच्या काळपट-हिरव्या रंगात रंगलेल्या डोंगररांगा आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात विलक्षण रंगसंगती साधत तरंगणारा धुक्याचा शुभ्र कापूस .... बस्स!! त्याच धुक्याच्या मागे आदल्या दिवशी भयाण वाटलेलं ते जंगल पसरलेलं होतं हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं. बऱ्याच वर्षांनी दिवसाची अशी अप्रतिम सुरूवात झाली होती. कारण, इथे वापीत राहून असं धुकं-बिकं सगळं विसरायलाच झालंय आता....

पण आदित्यच्या दृष्टीने मात्र दिवसाची सुरूवात 'डोकं पकवणारी' झाली होती. तो सबंध दिवस आम्हाला तिथल्या थीम-पार्क मध्ये घालवायचा होता. साहजिकच त्यादिवशी सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं कोण तयार झालं असेल तर आदित्य. कधी एकदा त्या थीम-पार्कचे दरवाजे उघडताहेत आणि आत घुसून तो तिथल्या वेगवेगळ्या राईड्सवर उलटापालटा, वरखाली, गोलगोल फिरायला सुरूवात करतोय असं त्याला झालं होतं. नेहेमीप्रमाणे नाश्त्याच्या ठिकाणी तो आमच्याआधी पोचला होता. जरा वेळाने मी तिथे गेले तर याचा चेहेरा पडलेला! समोर सगळे आवडीचे पदार्थ असताना आता हे काय नवीन ते मला कळेना. विचारल्यावर 'पाऊस पडतोय बाहेर' म्हणून माझ्यावरच डाफरला - . मग मला उलगडा झाला. बाहेर पाऊस म्हणजे तो थांबेपर्यंत तरी त्याला तसं उलटंपालटं होता येणार नव्हतं. वर डोकं-खाली पाय अश्याच वर्षानुवर्षांच्या अवस्थेत जमिनीवरच चालावं लागणार होतं. आता ती काही माझी चूक नव्हती. पण त्यानं त्याचा सगळा राग माझ्यावर काढला!!
... हवा किती झपाट्यानं बदलली होती! बोचरा गारवा होता म्हणून, नाहीतर मी आदित्यला घेऊन पावसात भिजायला नक्की गेले असते. पण आता नाईलाजास्तव इकडेतिकडे वेळ काढावा लागणार होता. मग आम्ही सगळेजण त्या रिसॉर्टच्या ४-५ मजल्यांवरून फेरफटका मारून आलो. सगळीकडे शॉपिंग मॉल्स, प्रदर्शनं, तरतऱ्हेच्या वस्तूंची दुकानं, उपहारगृहं अशी सरमिसळ होती. तिथे सुध्दा कुठून आलो, कुठे वळलो, किती मजले चढलो-उतरलो - काही म्हणता काही कळलं नाही. जमिनीच्या वर होतो की खाली ते ही लक्षात आलं नाही. 'तिथून पुन्हा आपापल्या खोल्यांपाशी परत जा' असं सांगितलं असतं तर कुणालाही ते जमलं नसतं. आमचा गाईड - झॅक - त्याच्यावरच आमची सगळी मदार होती. त्याच्या मागेमागे तिथे तसं फिरण्यात वेळ मात्र मस्त गेला आमचा .... आदित्य सोडून! त्याला एव्हाना 'आयुष्य व्यर्थ' वगैरे वाटायला लागलं होतं!! 'काही अर्थ नाही मलेशियाला येण्यात ...' इतपत विरक्ती पण आलेली होती....उरलासुरला राग काढायला आई होतीच!!! तासाभरानंतर मात्र पावसाला त्याची दया आली. लगेच त्याची कळी खुलली.

थीम-पार्कच्या प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाच्या मनगटावर एकएक कागदाचा, barcode असलेला पट्टा गुंडाळला गेला. तो त्या पार्कचा Multiple Entry Visa होता. त्याचा अर्थ आदित्यला सांगितल्यावर तो तर नाचायचाच बाकी राहिला होता. कितीही वेळा आतबाहेर करा, कुठल्याही राईड्सवर कितीही वेळा बसा - आता त्याला कुणीही अडवणार नव्हतं - अगदी आईसुध्दा!! बॅंकॉकपासूनच तो जोशी काका-काकू आणि पूर्वाताईबरोबरच असायचा बहुतेकवेळा. त्याची आणि पूर्वाताईची एव्हाना भलतीच गट्टी जमली होती. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा एकदा त्या थीमपार्कमध्ये शिरल्यावर तो त्यांच्याबरोबर जो गायब झाला माझ्यासमोरून तो थेट रात्री जेवायच्यावेळी पुन्हा भेटला मला. दिवसभर फक्त अधूनमधून कुठेतरी माझ्या दृष्टीस पडायचा, मध्येच कधीतरी त्याची हाक ऐकू यायची नाहीतर आवाज कानावर पडायचा इतकंच!

उच्च रक्तदाबवाल्यांना कुठल्याही राईड्सवर बसायला बंदी होती. त्यामुळे आईची इच्छा असूनही तिला कशात बसता आलं नाही. सासूबाईंना तिथला गारठा सहन झाला नाही. त्यांना थंडी वाजून ताप भरला. त्यामुळे त्या गोळी घेऊन खोलीत झोपून राहिल्या. बाबा मात्र अर्धा दिवस होते आमच्याबरोबर. तो दिवस माझ्या विशेष लक्षात राहिला त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच 'रोलर कोस्टर' नामक प्रकारात बसले. रोलर कोस्टरचं लहान रूप म्हणता ये‍ईल अशी एक राईड आधी दिसली, त्याच्यापासून सुरूवात करायचं ठरवलं. त्यात बसल्यावर आपल्याला मळमळलं नाही, पोटात ढवळलं नाही हे पाहून माझा उत्साह वाढला. मग मोठ्या रोलर कोस्टरवर बसायचं धाडस केलं. तिथे दोन ठिकाणी ३६० अंशात गिरकी घ्यायची होती. आधी २५-३० फ़ूट उंची गाठेपर्यंत मजा वाटली. पण खालच्या दिशेने जोरात निघाल्यावर मात्र वाट लागली. त्या वेगाचा, अचानक वळणांचा त्रास कमी करायचा असेल तर बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडावं असं मी एकदा कुठेतरी वाचलं होतं. पण हा गृहपाठ न करता जरी मी गेले असते तरी चाललं असतं कारण ऊर्ध्व दिशा बदलून अचानक एका क्षणी जेव्हा आपण खालच्या दिशेनं वजनविरहित अवस्थेत तुफान वेगात निघतो तेव्हा ओरडण्याशिवाय गत्यंतरच नसतं!! त्यात पुन्हा मी माझे डोळेही घट्ट मिटून घेतले होते. मधली ती ३६० अंशाची दोन वळणं येऊन गेलेली आता अंधूक आठवताहेत मला... पण काही सेकंदांनंतर थांबल्यावर मात्र मेंदूत प्रचंड वावटळ येऊन गेल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ!! पण मी खूष होते. कारण, इतके दिवस ज्या राईड्सकडे नुसतं पाहून मला पोटात ढवळायचं त्यांपैकी एका रोलर कोस्टरसारख्या महारथी राईडमध्ये त्या दिवशी मी चक्क बसले होते, ओरडले होते, हवेत गटांगळ्या खाल्या होत्या, गिरक्या घेतल्या होत्या .... मजा आली, त्रास झाला नाही पण का कोण जाणे, पुन्हा त्यात बसावंसंही वाटलं नाही. मात्र आधी द्विगुणित झालेला माझा उत्साह आता दशगुणित झाला होता. आता जरा आव्हानात्मक, उच्च्पदस्थ राईड्सकडेच माझं लक्ष जायला लागलं. एक Space Shot नामक राईड होती. एका ४०-५० फ़ूट उंच खांबावरून आपण बसलेला पाळणा खूप वेगाने वर खाली होतो. क्षणार्धात २५-३० फ़ूट वर, क्षणार्धात खाली .... बाकी काही नाही तरी दुपारनंतर त्या राईडमध्ये बसायचंच असं मी ठरवून टाकलं.

मी आणि बाबांनी आदित्यला आग्रह करून Go Carting ला पण नेलं. तो आधी तयार नव्हता - कदाचित चार चाकी गाडी चालवायची होती म्हणून असेल. तिथल्या त्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे खऱ्या गाड्यांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती होत्या. मारे अगदी F-1 च्या थाटात आम्ही हेलमेट घालून गाडीत बसलो, सीट-बेल्ट्स लावले ... आदित्यसाठी तर ते सगळं एकदमच रोमांचकारी होतं. सगळ्यांची पूर्वतयारी होईपर्यंत अगदी शिस्तीत सिग्नलचा लाल दिवा वगैरे चालू होता. तो हिरवा झाल्यावर सगळ्यांच्या अंगात अचानक 'शूमाकर' संचारला. पण त्या भ्रमाचा भोपळाही लगेच फुटला कारण कितीही केलं तरी त्या गाड्यांचा वेग १०-१५ च्या पुढे जातच नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनंच तशी तजवीज केलेली असणार म्हणा. १-२ फेऱ्या मारल्यावर मला आणि बाबांना तर कंटाळाच आला पण अर्ध्यातच थांबायला परवानगी नव्हती ... झक्कत त्या ४-५ फेऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. आदित्यला मात्र खूपच मजा आली....

अर्धा दिवस संपत आला होता. आम्ही इकडेतिकडे भटकत होतो, मध्येच मनात आलं की एखाद्या राईडमध्ये बसत होतो .... त्या राईड्सप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, ते तसं वयाचं, वेळेचं बंधन नसणं त्यादिवशी जास्त भावलं मला. दुपारी दोन वाजता इतरांबरोबर जेवायला जाणं मात्र अपरिहार्य होतं - ते सुध्दा वेळेचं बंधन म्हणून नव्हे तर नंतर एकट्याने गेलो असतो तर रस्ता सापडला नसता म्हणून...!!

जेवणानंतर सगळ्या आजी-आजोबांनी वामकुक्षीला प्राधान्य दिलं आणि आमच्यासारखे मात्र निघाले पुन्हा हुंदडायला. सकाळच्या त्या कोवळ्या किरणांनंतर दिवसभर सूर्य काही दिसला नाही. खूप धुकं होतं, गारठा होता पण तेच बरं होतं. स्वच्छ आकाश आणि कडक ऊन असतं तर मला वाटतं मी पण खोलीत बसून राहणं पसंत केलं असतं. लांबून Space Shot खुणावत होतं पण भरल्यापोटी लगेच कसं काय बसणार त्यात! मग एका निवांत ट्रेनमधून एक मोठी फेरी मारली, तिथल्या 'ग्रीन हाऊस'मध्ये पानं-फुलं बघत थोडा वेळ काढला. एका दुकानातून कॉफ़ीचा वास दरवळत आला. मग मस्त वाफाळती कॉफ़ी प्यायलो. तिथेच मक्याचे उकडलेले दाणे पण मिळाले गरमागरम. मजा आली ते पण खायला ...
अचानक वारा खूप जोरात वाहायला लागला, धुकं अजून दाटदाट व्हायला लागलं, गारठ्याचा बोचरेपणा अजूनच वाढला आणि एकएक करत सगळ्या राईड्स अपुऱ्या प्रकाशामुळे आणि धुक्यामुळे बंद झाल्या!!! नंतर सहा वाजेपर्यंत वाट पाहिली पण एकदोन अपवाद वगळता त्या पुन्हा सुरू नाही झाल्या. Space Shot मध्ये बसण्यासाठी एकवटलेला धीर सरळसरळ वाया गेला...!! पण आता त्याला काही इलाज नव्हता.

संध्याकाळनंतर तिथला 'कॅसिनो' बघायला जायचं होतं. वयोमर्यादा आणि वेशभूषा मर्यादा यांमुळे आदित्य आणि अजय दोघंही तिथे येऊ शकले नाहीत. पुरुषांसाठी लांब बाह्यांचा शर्ट आणि पॅंट घालणं आवश्यक होतं. तसा शर्ट नव्हता म्हणून अजय आणि १२ वर्षांखालील मुलांना आत प्रवेश नव्हता म्हणून आदित्य...!! वयोमर्यादा समजण्यासारखी होती पण जुगारच खेळायचा तर लांब बाह्या काय आणि अर्धी चड्डी काय - काय फरक पडणार होता कोण जाणे!! त्या दोन अटींत बसणारे इतर सगळे मग त्या कॅसिनोतून फिरून आलो. मला स्वतःला सुध्दा त्यात विशेष स्वारस्य होतं अशातला भाग नाही पण 'नाहीतर अश्याठिकाणी आपण जायची वेळ तरी कधी येणार' या शुध्द हेतूनं मी तिथे गेले होते.
तो जगातला सर्वात मोठा कॅसिनो आहे. दूरदेशातले लोक गेटींग हायलंडला केवळ त्या कॅसिनोसाठी येतात असं कळलं. तीन मजल्यांवरच्या मोठमोठ्या दालनांत निरनिराळ्या प्रकारांचे जुगार अगदी रंगात आले होते. छतावर लटकणारी प्रचंड झुंबरं आणि एकूणच प्रकाशयोजना अप्रतिम होती. उंची दारूचे ग्लास, सिगारेटी, लोकांचे वेष - सगळ्यांतून श्रीमंती नुसती ओसंडून वाहत होती. काहीही शारिरीक कष्ट न करता, बसल्याजागी, केवळ नशिबावर हवाला ठेवून पैसे कमवण्याची माणसाची वृत्ती अजबच म्हणायला हवी. आपल्यासारख्या नोकरी-धंदा करून, दिवसभर खपून भविष्याची चिंता करणाऱ्या मध्यमवर्गीयांना तिथली ती गर्दी पाहून 'आपण मूर्खपणा तर करत नाही आहोत' अशी शंका सुध्दा ये‍ईल कदाचित!! जुगार खेळणाऱ्यांच्यात स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. मी एक-दोन टेबलांपाशी थोडा वेळ थांबून इमानदारीत समोर काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण ओ की ठो कळलं नाही. बरं, सगळे व्यवहार शांतपणे चाललेले. त्यामुळे कानावर पडणाऱ्या शब्दांतून काही आकलन व्हावं तर ते ही नाही!! मला तिथली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथल्या त्या खोट्या नाण्यांची वर्गवारी करणारी यंत्रं!! त्या यंत्रात नाणी टाकली की क्षणार्धात दुसऱ्या बाजूने त्या-त्या नाण्यांच्या किंमतींप्रमाणे त्यांचे वेगवेगळे गट बनून बाहेर यायचे. तेच पहायला नंतर मला जास्त मजा आली. थोड्या वेळानं मात्र त्या सिगारेटचा धूर भरून राहिलेल्या खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखं व्हायला लागलं.... 'उंची वातावरणात मध्यमवर्गीयांचा जीव गुदमरतो' हे विधान शब्दशः खरं ठरलेलं पाहून मला हसू आलं!!

रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. पुन्हा एकदा अनेक सरकत्या जिन्यांवरून वर-खाली सरकून रेस्तरॉंपाशी पोचलो. प्रवेशद्वारापाशीच एका भिंतीला लागून अनेक उंच, पारदर्शक बाटल्यांमध्ये मसाल्यांचे निरनिराळे जिन्नस भरून ठेवलेले होते - नुसते देखाव्याला. आदल्या दिवशी जेवायला गेलो तेव्हा तिकडे लक्ष गेलं नव्हतं. एखाद्या रेस्तरॉंच्या अंतर्गत सजावटीचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. बघायला खरंच छान वाटलं.

... मलेशियात येऊनसुध्दा चोवीस तास उलटून गेले होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर 'एक दिवस थीम पार्कमध्ये' या गोष्टीबद्दल आधी मी म्हणावी तेवढी उत्सुक नव्हते. दिवसभर आदित्य मजा करेल आणि आपल्याला फक्त त्याच्या मागेमागे फिरावं लागेल अशी काहीशी माझी कल्पना होती. पण चोवीस तासांनंतर माझं मत पूर्णपणे बदललेलं होतं. आदित्यच्या बरोबरीनं आम्ही पण तेवढीच धम्माल केली होती....आणि एक गोष्ट नक्की होती - जसा पॅरासेलिंगचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहणार होता तसाच हा थीम पार्कमधला एक दिवस आदित्य कधीही विसरणार नव्हता....!!!

३१ ऑक्टोबर - अकरावा दिवस



सेलामत दातांग ... !!!

निघताना हुरहूर लागावी इतकं कोलंबोत राहिलोच नाही. थायलंडमध्ये खरं तर सर्वात जास्त मुक्काम होता. पण थायलंड सोडतानाही तसं काही वाटलं नाही ... एक तर पॅरासेलिंगच्या प्रभावातून मन अजून बाहेर आलं नव्हतं, शिवाय सिंगापूरची उत्सुकता होती. पण त्यादिवशी सिंगापूर सोडताना मात्र प्रथमच मनाला थोडीशी हुरहूर जाणवली. अजून २-३ दिवस तिथे रहायला सगळ्यांना आवडलं असतं. बॅंकॉकच्या रस्त्यांवरची गर्दी, खाद्यपदार्थांचे कसेतरीच, उग्र वास - काहीतरी होतं टीका करण्यासारखं ... पण या देशाने मात्र नावं ठेवायला जागाच सोडली नव्हती!! दोन दिवसांत मुख्य ठिकाणं पाहून झाली तरी इतर ठिकाणं पाहण्याच्या निमित्तानं अजून तिथला वाढीव मुक्काम चालला असता. शिवाय आपल्या सहलीचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय हे सुध्दा आत कुठेतरी सतत जाणवत होतं.

तरी त्यातल्यात्यात काहीतरी नाविन्य शोधायचं म्हटलं तर होतंच - त्यादिवशी आम्ही मलेशियाला जाणार होतो पण ते विमानानं नाही, तर बसनंच. अकरा-साडेअकराला आवरून खाली आलो. सामान आधीच खाली त्या छोट्या सरकत्या पट्ट्याजवळ जमा झालेलं होतं. सरहद्द ओलांडायची असल्यामुळे त्यादिवशी आमची रोजची बस नव्हती. त्याऐवजी सिंगापूरच्या दोन सरकारी बसेस दिमतीला होत्या. 'सरकारी बसेस असल्यामुळे थोडं जमवून घ्या' असा सौ.शिंदेंचा सबुरीचा सल्ला होता. मनात म्हटलं - जास्तीतजास्त काय होईल? बसच्या खिडक्यांचे पडदे साधे असतील, सीट्स कमी गुबगुबीत असतील, ए.सी. वगैरे विशेष नसेल ....'सिंगापूरची सरकारी बस' ही काय चीज आहे ते सेंटोसाला पाहिलं होतं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. आणि तसंच झालं - आपल्या आराम बसच्या पुन्हा एकदा तोंडात मारतील अश्या त्या दोन सरकारी बसेस आल्या. थोडं इकडे आणि थोडं तिकडे असं दोन्ही बसेसमध्ये सगळं सामान चढलं. तितक्यात, चेहेऱ्यावरून मराठी वाटणारे एक गृहस्थ शिंदे पतिपत्नींशी 'काय, कसं काय' करून पूर्वीची ओळख असल्यासारखे गप्पा मारत उभे असलेले दिसले. जरा आश्चर्य वाटलं. मग शिंदेंनी त्यांची ओळख करून दिली. आदल्या दिवशी आम्हाला मस्त पुणेरी, घरगुती जेवण पुरवणारे ते हेच - श्री. आपटे. आदल्या दिवशीचं जेवण कसं वाटलं हे विचारायला ते मुदाम आम्ही निघायच्यावेळी हॉटेलवर आले होते. मूळचे पुण्याचेच, पण गेली ८-१० वर्षं सिंगापूरमध्येच वास्तव्याला असलेले. त्यांचा तिथे तोच व्यवसाय आहे. साधं जेवण, सणासुदीचं जेवण, पूजेचं-मुंजीचं-होम हवनाचं साहित्य ते तिथे राहत असलेल्या भारतीय माणसांना पुरवतात. अगदी चौरंग, जानवी-जोड पासून भटजीपर्यंत सगळं. मनात आलं - एकतर यांनी एखादा भटजी नोकरीला ठेवला असेल किंवा स्वतःच भटजी बनून जात असतील ठिकठिकाणी! कारण चेहेऱ्यावरून पक्के 'ए'कारांत पुणेकर होते पण पक्के व्यावसायिकपण वाटत होते. सिंगापूरला येऊन हा व्यवसाय करावा हे त्यांच्या मनात आलं यातच सगळं आलं. तो त्यांचा व्यवसाय तिथे इतका जोरदार चालण्यामागे सुध्दा मानवी स्वभावधर्मच आहे. आपल्या मूळ घरापासून, गावापासून, प्रदेशापासून लांब राहणाऱ्या लोकांना आपले धार्मिक कुळाचार पाळण्याची जास्त गरज वाटते नेहेमीच. तसं करून ते त्या परमुलखात, वेगळ्या वातावरणात आपला भारतीयपणा, मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण आपला भारतीयपणा, मराठीपणा जपतोय हे तिथल्या इतर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात .......
तर, त्यादिवशीसुध्दा प्रवासात आम्हाला जेवणाचे डबे मिळणार होते ते त्यांच्याकडूनच. ८-१० दिवस एकाच चवीचं मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर दोन दिवस ते घरगुती जेवण म्हणजे खरंच एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. तसंही, केवळ दोन दिवसांच्या वास्तव्यातच सिंगापूरने तरी दुसरं काय केलं होतं? निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या पध्दतीने आम्हाला सुखद आश्चर्याचे धक्केच तर दिले होते. 'जीवन में एक बार आना सिंगापूर ...' हे अगदी खरं होतं!!! फक्त, ती ओळ अजून थोडी सुधारावीशी वाटली - 'जीवन में किमान आठवडाभर आना सिंगापूर'!!!
दोन दिवस तिथे सूर्यदर्शन झालेलं नव्हतं पण निघायच्या दिवशी मात्र सिंगापूरचा सूर्य पण आला निरोप द्यायला. निघाल्यावर साधारण अर्ध्या तासाने सिंगापूरच्या सीमेजवळ उतरलो. आमच्याबरोबरच आमचं सामानपण खाली उतरवण्यात आलं. आपापलं सामान घेऊन इमिग्रेशनच्या ऑफ़िसमध्ये जायचं होतं. म्हणजे प्रक्रिया सगळी विमानतळासारखीच, प्रवास फक्त बसचा होता. सुदैवाने गर्दी वगैरे काही नव्हती. शिवाय 'चार तास आधी चेक-इन' ही भानगड नव्हती. आमच्या गृपपैकी एका काकूंचा 'मलेशिया व्हिसा' मिळाला नव्हता. ते काम होतं. पण सगळंच पटापट आणि थोडक्यात उरकलं. त्या ऑफ़िसमधून सगळे बाहेर आलो. आता पुढच्या प्रवासासाठी मलेशियाच्या दोन बसेस उभ्या होत्या. त्या बसेसही एखाद्या विमानाच्या 'बिझिनेस क्लास'च्या तोंडात मारतील अश्या होत्या - एकदम ऐसपैस आणि मस्त!! चला, म्हणजे आता पुढचा ४-६ तासांचा प्रवास एकदम आरामात होणार होता.

पुण्याहून मुंबईला जावं इतक्या सहजतेने आम्ही सिंगापूरहून मलेशियाला चाललो होतो. सिंगापूर, मलेशिया हे पूर्व आशियातले देश आहेत यापलिकडे त्यांच्या भौगोलिक स्थितीकडे आपण विशेष लक्ष देत नाही. नकाशा नीट बघितला तर लक्षात येतं की हे दोन्ही शेजारी देश आहेत. मध्ये एक खाडी आहे म्हणून नाहीतर त्यांचे भूभाग पण एकमेकांना जोडले गेले असते. खाडीवरचा एक-दीड कि.मी. लांबीचा पूल हा त्यांच्यातला एकमेव दुवा आहे. तो भलाथोरला पूल म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना होता पण त्याचं नाव मात्र अगदी साधं - नुसतं 'कॉज-वे'!!! बांधकाम सुरू असलेल्या आपल्या 'वरळी-वांद्रे सागरी मार्गा'चं मला कोण कौतुक, नाव पण किती छान, घसघशीत - वरळी-वांद्रे सागरी मार्ग! आणि हा पूल त्याच्या कितीतरी आधी बनलेला, तेव्हा कदाचित सामान्य माणसाला जास्त नवलाईचा वाटला असणार. त्याला एखादं भारदस्त नाव शोभून दिसलं असतं!! 'कॉज-वे' म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एखादा अरुंद, अगदी पाण्याजवळून नेणारा रस्ता आला होता.
असा तो 'कॉज-वे' ओलांडून आता आम्ही अजून एका नव्या देशात प्रवेश केला होता. मलेशियात प्रवेश केल्यावर आणि 'क्वालालंपूर - १७० कि.मी.' अश्या प्रकारच्या पाट्या दिसायला लागल्यावर मात्र सकाळची ती हुरहूर केव्हा मागे पडली ते कळलंही नाही. इथे घड्याळांतली वेळ बदलायचा वगैरे प्रश्न नव्हता - साधारण एकाच रेखावृत्तावर दोन्ही देश आहेत. मग रस्त्यावरच्या पाट्या वाचायला सुरूवात केली. पाट्यांवरची लिपी इंग्रजी पण भाषा मलाय होती. पण ते जरा बरं वाटलं. अर्थ नाही कळला तरी निदान शब्द तरी कळत होते; अगदीच थायलंडसारखी निरक्षराची गत नव्हती. ज्या ठिकाणी त्या पाट्या असायच्या त्यावरून अर्थाचा साधारण अंदाज बांधता यायचा.रस्ता एकदम निर्मनुष्य होता. मध्येच एखाददुसरी गाडी दिसत होती. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मैलोगणती पामच्या झाडांची लागवड होती. मलेशियात प्रवेश केल्याकेल्या लगेचच त्या देशाचं वैशिष्ट्य म्हणून असलेली एक गोष्ट पहायला मिळाली आणि सिंगापूरप्रमाणेच मी मलेशियाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडले. रस्त्याला लागून पामची झाडं, थोड्या दूरवरपण पामची झाडं आणि लांबवर दिसणाऱ्या उंच डोंगरांवर पण पामचीच झाडं!! ते बघायला फारच छान वाटत होतं - अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं! काही वेळापूर्वी ती ऐसपैस बस पाहिल्यावर खरंतर मी एक मस्तपैकी झोप काढायचं ठरवलं होतं. पण त्या सुंदर पामच्या बागांनी माझी झोप कुठल्याकुठे पळवून लावली. तासाभरानंतर मुख्य रस्त्यावरून बस डावीकडे वळली. एके ठिकाणी १०-१५ मिनिटं थांबायचं होतं पाय मोकळे करायला. पामने मढलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याश्या हॉटेलपाशी उतरलो. तिथे नुकताच पाऊस पडून गेला होता. ढगाळ, दमट हवा होती. तिथल्या स्वच्छतागृहांवर 'lelaki' आणि 'wanita' अश्या पाट्या दिसल्या. लगेच लक्षात आलं की मलाय भाषेत 'पुरुष' आणि 'स्त्री' साठी अनुक्रमे 'lelaki' आणि 'wanita' हे शब्द आहेत. अर्थ कळल्यामुळे जाम आनंद झाला. पुढच्या दोन दिवसात मग मला तो नादच लागला - पाट्या वाचायच्या आणि त्याचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज बांधत बसायचं. १५-२० मिनिटांत सगळे ’लेलाकी’ आणि ’वनिता’ पुन्हा बसमध्ये चढले आणि तिथून निघाले.
पुन्हा तासभर प्रवास आणि पुन्हा एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. आपापले डबे घेऊन तिथल्या रेस्तरॉंमध्ये शिरलो. आत शिरताक्षणी एक अत्यंत उग्र, कसातरीच वास नाकात शिरला. इतरवेळी अश्या वासाच्या ठिकाणी जेवणाची कल्पनाही सहन झाली नसती. पण त्या दिवशी नाईलाज होता. पामच्या झाडांप्रमाणेच या वासानेही पुढे दोन दिवस आमची पाठ सोडली नाही ... कारण तो वास पाम तेलाचाच होता!! इतक्या सुंदर झाडांच्या बियांपासून इतक्या घाणेरड्या वासाचं तेल निघतं?? अर्थात हा सवयीचा भाग होता. ज्या तेलाच्या वासाला मी नाकं मुरडत होते त्याच तेलात बनवलेले कसलेकसले पदार्थ तिथले लोक मिटक्या मारत खात होते. त्या लोकांच्या ताटांत आणि एकूणच तिथल्या काचेच्या कपाटांत जे-जे काही मांडून, टांगून, पसरून ठेवलेलं होतं ना ते शिसारी आणणारं होतं. नंतरच्या दोन दिवसांत मलाय पदार्थ चाखून पाहण्याची माझी इच्छा केव्हाच मेली होती. या सगळ्या पूर्व आशियाई राष्ट्रांत शाकाहारी माणसं फारच थोडी सापडतात आणि त्यांचा मांसाहार हा आपल्या कल्पनेपलिकडचा असतो. ते तसले पदार्थ तोंडात घालणं तर सोडाच, नुसते बघण्यासाठी पण मनाची बरीच तयारी करावी लागते.
आमचं जेवण चालू असतानाच तिथे एक मलाय कुटुंब आलं. त्यांतल्या ८-१० वर्षांच्या एका खट्याळ पोरानं आमच्या डब्यांत वाकून पाहिलं आणि जसं मी नाक मुरडलं होतं तसंच त्यानं आमच्या पुरी-भाजी, गुलाबजाम, दही-भात या जेवणाकडे बघून तोंड वाकडं केलं. तिथल्या तिथे फिट्टमफाट!! इतरही अनेक लोक आमच्या जेवणाकडे वळूनवळून पाहत होते. कदाचित मस्त, सुग्रास खेकड्याचं कालवण खाताना गोडेतेलाचा 'घाणेरडा वास' त्यांच्या नाकात शिरला असेल आणि त्यांच्या जेवणाची मजाच गेली असेल ...
दुसऱ्या बसमध्ये एक टूरिस्ट गाईड होती. तिने दिलेली प्राथमिक माहिती आमच्या सहप्रवाश्यांकडून कळली. मलाय भाषेत स्वागत करायचे असेल तर 'selamat datang' असं म्हणतात. ही अक्षरं तिथे हॉटेलमध्येही दिसली होती.
सकाळच्या प्रवासात मंडळींची एकएक डुलकी झालेली होती, आता जेवणंही झाली होती. तिथून निघाल्यावर मग बसमध्ये गाणी, गप्पा, जोक्स, नकला सुरू झाल्या. तो तास-दीड तास मजेत गेला.
संध्याकाळी क्वालालंपूर शहरात पोहोचलो. डावीकडच्या खिडकीतून लांबवर पेट्रोनास ट्विन टॉवर्स दिसले. मलेशियातली तेवढी एकच गोष्ट फक्त माहित होती, त्यामुळे सगळे 'बघू, बघू' करत डाव्या बाजूच्या खिडक्यांतून डोकावून पहायला लागले आणि एखादी नवलाईची गोष्ट सापडावी तसे खूष झाले. ते टॉवर्स पुढच्या दोन दिवसांत सतत दिसतच राहिले. जरा इकडे-तिकडे नजर वळवली की कुठेनाकुठेतरी दिसायचेच. पण त्या क्षणी ते माहिती नव्हतं. त्यामुळे आयुष्यातली ती जणू एक मोलाची संधी दवडण्याची कुणाची तयारी नव्हती.
त्यादिवशी आम्हाला क्वालालंपूरहून पुढे 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. 'गेंटींग हायलंड' - तिथलं एक प्रसिध्द थंड हवेचं ठिकाण - मलेशियाचं महाबळेश्वर!! क्वालालंपूर शहरात न शिरता बसने घाटरस्ता पकडला. जसजशी हवा गार-गार होत गेली, ढग-धुकं वाढायला लागलं, तसतसे ते पाम पांघरून बसलेले डोंगर अजूनच छान दिसायला लागले. वळणावळणाचा रस्ता पोटातल्या पाण्यात ढवळाढवळ करणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. माझं पाट्या वाचण्याचं काम सुरूच होतं. त्या रस्त्यावर सतत 'ikut kiri' अशी एक पाटी दिसत होती. २-३ दिवसांच्या संशोधना‍अंती त्याचा अर्थ 'Keep left' आहे असं लक्षात आलं. रंगरूप बदललं, देश-वेष बदलला तरी रहदारीच्या नियमांसारख्या काही गोष्टी लोकांच्या मनावर सतत बिंबवाव्याच लागतात. त्या बाबतीत जगभर एकवाक्यता दिसून येईल ... आणि त्या सतत बिंबवल्या जाणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीतही!!
'गेंटींग हायलंड'च्या पायथ्यापाशी उतरलो तेव्हा दिवस पूर्णपणे बुडालेला होता. हवेत बोचरा गारवा होता. काहीजणांनी आपापले स्वेटर्स वगैरे बाहेर काढले. पुणेकरांचा गुलाबी थंडीबद्दलचा 'जाज्वल्य अभिमान' लगेच उफाळून आला. 'स्वेटर घातलेले सगळे मुंबईकर, न घातलेले सगळे पुणेकर' अशी थट्टा सुरू झाली. मुंबईकरांना नावं ठेवण्याची अशी नामी संधी पुणेकर थोडीच सोडणार होते ....
त्या पायथ्यापासून आम्हाला केबल कारने वर 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. ती आशिया खंडातली सर्वात मोठी केबल कार समजली जाते. गुडुप अंधारात, त्या एकमेव केबलच्या भरवश्यावर आमच्या निरनिराळ्या केबिन्सची वरात २००० मी. उंचीवरच्या त्या डोंगराच्या दिशेने निघाली. खाली उंचच्या उंच पर्जन्यवृक्षांचं निबिड अरण्य मिट्ट काळोखात एकदम भयाण वाटत होतं. 'Rain-forests of Malaysia ...' हे शब्द डिस्कवरीवरच्या कार्यक्रमांत अनेकदा ऐकले होते - तेच हे मलेशियातलं जगप्रसिध्द, घनदाट पर्जन्यवन. केबलला आधार देणाऱ्या मोठ्या खांबांजवळ तेवढा एखादा मिणमिणता दिवा असायचा. बाकी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं. अश्या ठिकाणी 'अचानक वीज गेली तर ...', 'काही बिघाड झाला तर ...' असल्या शंका हटकून मनात येतातच. केबिन्सच्या आतल्या बाजूला सुरक्षाविषयक सगळे नियम आणि सूचना लिहिलेल्या होत्या त्या आधी वाचून काढल्या. आदित्यला समजावून सांगितल्या. भीती अशी वाटत नव्हती पण नाही म्हटलं तरी अंधाराचा मनावर थोडा परिणाम झालेलाच होता. पण त्याबरोबरच हा प्रवास दिवसाउजेडी करायला तितकीच मजा येईल हे ही कळत होतं.
निसर्गावर मात करणं माणसाला कदापि शक्य नाही हे अश्या वेळेला पटतं. घनदाट जंगलातून उंच डोंगरावर सहजगत्या पोचण्यासाठी एक अत्याधुनिक वाहतुकीचं साधन उपलब्ध करणं म्हणजे कौशल्याचं काम होतं हे खरंच! माणसाच्या मेंदूला तिथे दाद ही दिलीच पाहिजे. पण म्हणून केवळ त्या बुध्दीच्या जोरावर निसर्गावर कुरघोडी करायचा कुणी आव आणत असेल तर निसर्ग त्याला अश्या ठिकाणी बरोब्बर त्याची जागा दाखवून देतो. शारीरिक इजा पोहोचू नये म्हणून खबरदारीचे अनेक उपाय योजता येतात पण त्या जीवघेण्या शांततेत, काळोखात बुडलेल्या दाट जंगलात हे पण कळून चुकतं की माणूस हा त्या सर्वशक्तिमान निसर्गाच्या दृष्टीने इतर किडा-मुंग्यांसारखाच!!
त्या अर्ध्या तासात मध्ये काही काळ तर असा होता की मागचं दिसेनासं झालं होतं आणि पुढची लोकवस्तीची चिन्हं दिसायला अजून वेळ होता. त्या अंधाराच्या साम्राज्याच्या दोन्ही टोकांना मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. थोड्या वेळानंतर वर लांबवर दिवे लुकलुकायला लागले. ३०-३५ मिनिटं ती तशी लटकत मार्गक्रमणा केल्यावर आम्ही उतरलो.
एखाद्या पर्यटनस्थळी जशी संध्याकाळच्या वेळी माणसांची गजबज, दिव्यांची रोषणाई वगैरे असते तशीच तिथे होती. हॉटेलच्या खोल्या ताब्यात घेतल्या, सामान टाकलं आणि जेवणासाठी पुन्हा बाहेर एकत्र जमलो. जेवणाचं ठिकाण तिथून थोडं लांब होतं. म्हणजे त्याच परिसरात होतं पण चालत जायला १५-२० मि. लागायची. आणि ते चालत जाणं म्हणजे सुध्दा प्रत्यक्ष चालणं कमी आणि सरकत्या जिन्यांवरून वर-खाली करणं जास्त होतं. त्या रिसॉर्टचे जमिनीखाली आणि वर मिळून जवळजवळ १२-१५ मजले होते. जेवणाचं ठिकाण सातव्या मजल्यावर होतं. आता तो सातवा मजला म्हणजे सुध्दा एकूणातला सातवा की जमिनीवरचा सातवा की जमिनीखालचा सातवा हे शेवटपर्यंत कळलं नाही. पण जवळजवळ ६-७ सरकत्या जिन्यांवरून सरकून (वर की खाली ते ही आता आठवत नाहीये!!) गेल्यावर आम्ही त्या जेवायच्या ठिकाणी पोहोचायचो. माझी तर दरवेळी त्या सरकत्या जिन्यांची मोजदाद चुकायची. पु.लं.च्या 'वाऱ्यावरची वरात' मध्ये कसा तो 'गरूडछाप तपकीर'वाला पु.लं.ना सांगतो - 'दोन डोंगर चढायचे, दोन उतरायचे - पायथ्याशी गावडेवाडी' तसंच काहीसं होतं तिथे - ४-६ सरकते जिने चढायचे, ७-८ उतरायचे, पायथ्याशी जेवण!! काय गंमत आहे ना ... कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच. त्यांची कुठली ना कुठली तरी शाब्दिक कोटी, कुठला ना कुठला तरी विनोद त्या प्रसंगात चपखल बसतोच. मलेशिया हा जेव्हा अजून मलेशिया झालेला नव्हता तेव्हाचाही - पु.लं.च्या 'पूर्वरंग'तून माहिती होताच की!! म्हणजे मलाय देश आणि पु.ल. ही जोडी अगदीच विजोड नव्हती ...

रात्री १० च्या सुमाराला हॉटेलवर परतलो. घरातून निघाल्यापासून प्रथमच जरा सुखद थंडी अनुभवायला मिळत होती. ट्रीपला जायचं ठरल्यावर ती ठिकाणं थंड हवेची नाहीत म्हणून आदित्य सुरूवातीला थोडा खजील झाला होता. तो त्या थंडीमुळे जरा खूष झाला. त्याला आता दुसऱ्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती कारण तिथला दुसरा दिवस हा त्याच्या वयाच्या मुलांच्या खास आकर्षणाचा असणार होता.
चार भिंतींतल्या सुरक्षित अंधारात सगळे झोपेच्या अधीन झाले. हा अंधार आणि काही तासांपूर्वीचा तो जंगलातला भयाण अंधार - दोन्हीत किती फरक होता .... !!!